घाम येणे ही तशी नैसर्गिक क्रिया समजली जाते. काही जणांना इतका घाम येतो की ते घामाने अगदी चिंब होतात. वास्तवात शरीराला घाम येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ज्याचा मुख्य हेतू शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवणे, हा आहे. शरीरामधील चेतनेच्या विद्युतवहनाद्वारे वा शरीराचे तापमान खूप वाढल्यामुळे मस्तिष्कामधील हायपोथलॅमसच्या पुढील भागाचे उद्दिपन होते, तेव्हा त्याच्याकडून स्वेदग्रंथींना घाम निर्माण करण्याचा आदेश मिळतो. थोडक्यात जेव्हा जेव्हा शरीराचे अंतर्गत तापमान वाढते, तेव्हा तेव्हा त्वचेखालील स्वेदग्रंथींकडून अधिक प्रमाणात घाम स्त्रवला जातो. त्वचेवरील या घामाचे बाष्पीभवन होण्यासाठी शरीरामधील उष्णता वापरली जाते आणि शरीरान्तर्गत थंडावा तयार होतो.
शरीराच्या मांसपेशींच्या आकुंचन-प्रसरणामुळे (अर्थात शरीराला होणार्या व्यायामामुळे) सुद्धा स्वेदग्रंथी अधिक प्रमाणात घाम निर्माण करतात, जो शरीरामध्ये तयार झालेली अधिकची उष्णता बाहेर फेकण्याचा प्रयत्न असतो. एकंदर काय तर घाम येणे ही शरीराला आवश्यक अशी क्रिया आहे.
आरोग्य सुस्थितीमध्ये असलेल्या प्रत्येकाला घाम कधी व किती प्रमाणात येईल, याचे निश्चित उत्तर देता येणार नाही. ज्याप्रमाणे मलमूत्राचे प्रमाण किती असणे, विसर्जन कितीवेळा होणे हे व्यक्तीव्यक्तीनुसार बदलते. उन्हामध्ये फिरल्यानंतर, व्यायाम केल्यावर , खूप चिडल्यामुळे किंवा कामोद्दिपित झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीला दुसर्या व्यक्तीपेक्षा अधिक प्रमाणात घाम येत असेल तर तो काही आजार समजला जात नाही. त्याच्या स्वेदग्रंथी अधिक प्रमाणात उद्दिपित होतात व अधिक घाम बाहेर फेकतात इतकेच म्हणता येईल. त्यामुळे त्याचा खरं तर फार बाऊ करु नये.
माहिती : अंतरजाल साभार